नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राजधानी दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली पुर्ण ताकद लावूनही आठ वर्ष जुन्या असलेल्या आम आदमी पक्षाने मुसंडी मारली आहे. दिल्लीमध्ये जरी 7 मतदारसंघात भाजपचं वर्चस्व असले तरी विधानसभेवर झेंडा फडकवण्याचे भाजपचे स्वप्न अपुर्ण राहण्याचे चिन्ह दिसत आहे. भाजपने दिल्लीमध्ये अखेरचा विजय पहिल्या विधानसभा निवडणुकीत म्हणजे 1993 साली मिळवला होता. या एकाच टर्ममध्ये भाजपने मदन लाल खुराना, साहिब सिंग वर्मा आणि सुषमा स्वराज हे तीन मुख्यमंत्री दिले होते. यानंतर सलग तीन वेळा काँग्रेसने दिवंगत नेत्या शीला दीक्षित यांच्या नेतृत्त्वात सत्ता मिळवली. तर २०१३ आणि २०१५ ला केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते.
दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी मजमोजणी सुरु झाल्यावर आम आदमी पार्टीने घेतलेली आघाडी सर्व कल हाती येईपर्यंत कायम राहिली. त्यातच भाजप कार्यालयात लागलेल्या पोस्टरमुळे भाजपने पराभव स्वीकारल्याचे चिन्हं दिसून आले. सध्या अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात आम आदमी पार्टीने 70 पैकी 50 जांगावर आघाडी घेतली आहे.
सर्व एक्झिट पोलच्या सर्वेनुसार दिल्लीमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाचं सरकार येणार आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये ‘आप’ ला बहुमत मिळताना दाखवले आहे. यंदा भाजपला मोठा फटका बसणार असून त्यांना अपेक्षित जागा मिळणार नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्याचबरोबर कॉंग्रेसचे दिल्लीमध्ये पुन्हा पानीपत होताना या एक्झिट पोलमधून दिसत आहे.
मतमोजणीपुर्वीच भाजपचे दिल्ली अध्यक्ष आणि खासदार मनोज तिवारी यांनी विजयाचा दावा केला होता. पण भाजप कार्यालयात लागलेल्या पोस्टर्समुळे भाजपने आधी पराभव मान्य केला नाही ना, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. विजयाने आम्ही अहंकारी होत नाही, पराभवाने खचून जात नाही, अशा आशयाचे पोस्टर्स देखील लावण्यात आले आहेत.