नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठा आकडा मिळवत अरविंद केजरीवाल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न केले होते. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असे वाटत असताना मात्र आम आदमी पार्टीला एकतर्फी यश मिळल्याचे निकलावरून दिसून येते. पण निवडणुकीची घोषणा झाल्यापासून ते निवडणुकांचा निकाल येईपर्यंत भाजप कडून अरविंद केजरीवाल यांच्यावर टोकाची आणि जबरदस्त टिका करण्यात आली होती. एवढाच नव्हे तर भाजप उमेदवारांनी केजरीवालांना दहशतवादी देखील म्हंटल होतं. मात्र दिल्लीकरांनी अखेर केजरीवालांनाच कौल दिला.
केजरीवालांवर टिका करणाऱ्या भाजप उमेदवारांचा दारुण पराभव झाल्याचे या निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. असे कोण आहेत ज्यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला पाहूया
कपिल मिश्रांचा दारुण पराभव
२०१५ ची विधानसभा निवडणुकीत कपिल मिश्रांनी आपच्या तिकीटावर लढवली. त्यांच्याकडे जल मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आला होता. मात्र केजरीवालांवर टीका करत त्यांनी पक्ष सोडला. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू होताच त्यांनी केजरीवालांना दहशतवादी म्हटलं. केजरीवालांवर पातळी सोडून टीका करणाऱ्या मिश्रा यांना जनतेनं स्पष्टपणे नाकारलं. आपच्या अखिलेश पति त्रिपाठी यांनी त्यांचा जवळपास ११ हजार मतांनी पराभव केला.
शाहीन बागेवरुन राजकारण करणं परवेश वर्मांना महागात
लोकसभेत पश्चिम दिल्लीचं प्रतिनिधीत्व करणारे भाजपा खासदार परवेश वर्मा यांनी प्रचारादरम्यान आप आणि केजरीवालांवर तोंडसुख घेतलं. शाहीन बाग, बिर्यानी, बांगलादेश, पाकिस्तान, दहशतवादी अशा शब्दांचा वर्मा यांनी प्रचारादरम्यान वापर केला. वर्मा यांच्या लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या दहा जागा येतात. त्या सर्वच्या सर्व १० जागांवर भाजपाला पराभव पत्करावा लागला.
तेजिंदर सिंह बग्गांना जनतेनं नाकारलं
हरी नगर विधानसभा मतदारसंघातून भाजपानं तेजिंदर सिंग बग्गा यांना उमेदवारी दिली होती. फायर ब्रँड नेते म्हणून स्वत:ची प्रतिमा निर्माण करण्याच्या प्रयत्नात बग्गा यांनी अनेकदा केजरीवालांना लक्ष्य केलं. गेल्या पाच वर्षांपासून ते ट्विटरवरही आक्रमक होते. निवडणूक प्रचारादरम्यान ते जाहीरपणे केजरीवालांना दहशतवादी म्हणत होते. आपच्या उमेदवार राज कुमारी ढिल्लॉ यांनी त्यांचा १७ हजारहून अधिक मतांनी पराभव केला.