नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली विधानसभा निवडणूका जाहीर झाल्यापासून सर्व राजकीय पक्षांनी प्रचारासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. दिल्लीत ८ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ११ फेब्रुवारीला निकाल लागणार आहे. प्रचारासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मागील पाच वर्षात केलेली कामगिरी जनतेला सांगत असून दिल्लीतील जनतेच्या अपेक्षेपेक्षा अधिक कामे आपच्या सरकारने केली आहेत, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. पण भाजपने दिल्लीतील जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केजरीवाल सरकारवर केला आहे.
तसेच भाजपने पाच वर्षात केजरीवाल सरकारपेक्षा पाच पटीने जास्त कामे करण्याचा दावा करत ती कामे केली नाहीत तर राजकारणातून संन्यास घेईल, असे वक्तव्य एका भाजप नेत्याने केले आहे. भाजपचे दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी एका मुलाखतीदरम्यान त्यांनी सांगितले. शाळा, बेरोजगारांना नोकऱ्या, प्रत्येक नागरिकाला अनुदान दिल्याचा जो काय दावा आम आदमी पक्षाने केला आहे, त्याच्या पाच पट जास्त दिल्लीला देऊ, असे मनोज तिवारी यांनी म्हटले आहे.
प्रत्येक घरात शुद्ध पाण्याची व्यवस्था करू, हवेतील प्रदूषण कमी करू, पाच हजार नवीन इलेक्ट्रॉनिक बसेस याशिवाय सीएनजी बसेससोबत दिल्लीच्या ट्रान्सपोर्ट कनेक्टिव्हिटी चांगली करण्याचे लक्ष्य आहे. दिल्लीतील बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या रुग्णालयांठी योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही मनोज तिवारी यांनी सांगितले आहे. तसेच यमुना नदीवर रिव्हर फ्रंट तयार केला जाईल. ज्याठिकाणी झोपडपट्टी आहे, त्याठिकाणी आवास योजनेच्या माध्यमातून लोकांसाठी घरांची व्यवस्था करण्यात येईल. गॅस, पाण्याचे कनेक्शन आणि शौचालय यांसारख्या सुविधा चांगल्या केल्या जातील, असे तिवारी यांनी सांगितले.