बहुजननामा ऑनलाईन – अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणी अटक केलेल्या निलंबित एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डीला गुरुवारी (दि. 29) धारणी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. दिपाली आत्महत्या प्रकरणात अचलपूर न्यायालयाने ठेवलेल्या गंभीर ठपक्यानंतर रेड्डीला सहआरोपी करत अटक केली आहे. हा राज्यातील प्रत्येकाचा विजय आहे ज्यांनी आवाज उठवला. आता तरी सरकारने या घटनेचा बोध घेत शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कंपनीत ICC कमिटी बंधनकारक करत त्यांच ऑडीट करावे, असे असे ट्विट भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे.
हरिसालच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणात गुगामल वन्यजीव विभागाचा निलंबित आरोपी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार याला अटक झाली.
त्यानंतर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा एपीसीसीएफ श्रीनिवास रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी दीपाली चव्हाणचे पती राजेश मोहिते यांनी धारणी पोलीस ठाण्यात 26 मार्चला फिर्याद दिली होती. त्यात श्रीनिवास रेड्डी सुद्धा दीपावलीच्या मृत्यूस जबाबदार असल्याने यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. त्यानंतर शासनाने विविध समित्या गठीत केल्या. या प्रकरणाच्या चौकशीसाठी आयपीएस अधिकारी प्रज्ञा सरवदे यांची नियुक्ती केली होती. त्यांनी संपूर्ण प्रकरणात अधिकारी कर्मचाऱ्यांचे बयान नोंदविले त्यानंतर अचानक घडामोडी घडल्या व रेड्डीला तडकाफडकी अटक झाली. याबाबत चित्रा वाघ यांनी समाधान व्यक्त करत राज्य सरकारला शासकीय, निमशासकीय व खाजगी कंपनीत ICC कमिटी बंधनकारक करत त्यांच ऑडीट करावे अशी आशा व्यक्त केली आहे.