मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ब्रेक द चेन मोहिमेअंतर्गत १५ दिवस कडक संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक पत्र लिहिले असल्याचे समोर आले आहे. या पत्रात ठाकरे यांनी कोरोनाला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करावे त्याचबरोबर आपत्ती निधीच्या माध्यमातून प्रभावित व्यक्तींना मदत करावी अशी मागणी केली आहे. याला मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी दुजोरा दिला आहे.
कोरोनाचे संकट गडद होऊ लागल्याने मंगळवारी जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात निर्बध लागू करण्याची घोषणा केली होती. तसेच भूकंप, पूर, अवर्षण आल्यानंतर नैसर्गिक आपत्ती जाहीर केली जाते. त्याचबरोबर आपत्तीग्रस्तांना नुकसान भरपाई दिली जाते त्या पार्श्वभूमीवर कोरोनाला एक नैसर्गिक संकट म्हणून स्वीकारलं आहे. कोरोनामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले, बेरोजगारी वाढली अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे त्यांना आर्थिक मदत दिली जावी असे ठाकरे यांनी म्हंटले होते. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांना ठाकरेंनी पत्र पाठवले आहे.
या संदर्भात बोलताना सीताराम कुंटे म्हणाले की, कोरोना ही आपत्ती आहे मात्र याला नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करण्यात आली नाही. यामुळे कोरोनाचा फटका बसलेल्याना वैयक्तीक मदत करताना अडचणी येत आहे. त्यामुळे कोरोना संकटाला केंद्र पातळीवर नैसर्गिक आपत्ती घोषित करणे गरजेचे आहे. लवकरात लवकर केंद्राने पावले उचलायला हवी. असेही ते म्हणाले.