नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली हिंसाचारात शुक्रवारी मृतांची संख्या ४२ वर गेली असल्याची माहिती दिल्ली आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. गुरु तेग हा बहादूर रुग्णालयात ३८, लोक नायक जय प्रकाश रुग्णालयात ३ आणि जग परवेश चंद्र रुग्णालयात एक जणाचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. या हिंसाचारात २७५ पेक्षा जास्त लोकं जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहेत.
उत्तर-पूर्व दिल्लीत हिंसाचार झालेल्या भागात दुकाने उघडली असून परिस्थिती सामान्य असल्याचे दिसत आहे. रस्त्यावर पूर्वीप्रमाणे वाहतूक चालू झाली असून सोमवारपासून बाधित भागात ७ हजार अर्धसैनिक तैनात केले आहेत. तसेच शांतता कायम ठेवण्यासाठी दिल्ली पोलिसांचे शेकडो कर्मचारी कार्यरत असून वरिष्ठ अधिकारी सतत गस्त घालत आहे. तणावाचे वातावरण निवळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कुटूंबाला भेटण्यासाठी गेलेल्या दोन भावांची हत्या
उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील गोकलपुरीमध्ये आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबाला जीटीबी रुग्णालयात सापडले आहेत. यातील आमिर हा गाझियाबादमध्ये ड्रायवर म्हणून काम करत असून हाशिम हा त्याचा सहायक होता, अशी माहिती मिळत आहे. तसेच त्यांचे पोस्टमॉर्टम शनिवारी करण्यात येणार असल्याचेही सांगितले जात आहे.
१०० हून अधिक गुन्हे केले दाखल, दोषींना कठोर शिक्षा मिळणार
नवी दिल्लीचे पोलीस आयुक्त यांनी शुक्रवारी झालेल्या वरिष्ठ आयपीएस अधिकारी एस.एन. श्रीवास्तव यांनी ६० तासांत कोठेही हिंसाचाराचा प्रकार घडलेला नसून मागच्या काही दिवसांपासून पोलीस त्या भागात राहणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचत त्यांचे म्हणणे ऐकले आहे, असे म्हणाले. आपचे नेते ताहिर हुसेन यांच्याबाबत विचारले असता श्रीवास्तव म्हणाले की, कोणत्याही एका खटल्याची पर्वा नाही. आम्ही शंभराहून अधिक गुन्हे दाखल केले आहेत. दोषींना कठोर शिक्षा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.