नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बंगालच्या खाडीत निर्माण झालेले चक्रीवादळ अॅम्फान आज पश्चिम बंगालच्या दीघा आणि बांगलादेशच्या हतिया बेटाजवळ धडकण्याची शक्यता आहे. त्यावेळी वादळाचा वेग प्रतितास 185 किमी असू शकतो. हवामान विभागाने ओडिसा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, मिझोरम, मणिपूरसह तामिळनाडू, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेशात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर ओडिसाच्या समुद्रकिनार्यावरील जिल्हे हाय अलर्टवर आहेत.
चक्रीवादळ अॅम्फान काल अंशत: कमकुवत झाले असले तरी धोका टळलेला नाही. पश्चिम बंगाल आणि ओडिसाच्या समुद्रकिनार्यालगतच्या जिल्ह्यांचे नुकसान होईल, एवढी ताकद चक्रीवादळात आहे. त्यामुळे या दोन राज्यांमधील लाखो लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पश्चिम बंगालच्या दीघा किनार्यापासून 510 किमी अंतरावर बंगालच्या खाडीत या चक्रीवादळाचे केंद्र आहे. त्यामुळे हे वादळ उत्तर आणि उत्तर पूर्व दिशेने सरकण्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात अधिक सतर्कता बाळगली जात आहे. चक्रीवादळाचा धोका पाहता राज्य सरकारांसह केंद्र सरकारही सतर्क झाले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी बाचतीच केली. त्यानुसार केंद्र सरकार सर्वोतोपरी मदत करेल असे आश्वासन त्यांनी दिले. दुसरीकडे कोलकातामध्ये चक्रीवादळाचा परिणाम दिसू लागला असून पाऊस सुरु आहे. बंगालमध्ये भूस्खलनाची शक्यताही वर्तवली जात आहे. अॅम्फान चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल आणि ओडिसामध्ये आतापर्यंत एनडीआरएफची एकूण 41 पथके तैनात करण्यात आली आहेत. एनडीआरएफचे प्रमुख एस.एन. प्रधान यांनी दिलेल्या माहितीनुसार, अॅम्फान चक्रीवादळाच्या रुपात हे दुसरे संकट आहे. आधीच कोरोना व्हायरसचा सामन करत आहोत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात तयारी केली आहे.