पुणे : बहुजननामा ऑनलाईन- आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार प्रेमात पडले होते. ए.के.हनगल, बलराज सहानीं यांनी आण्णाऊ साठे यांच्या साहित्यावर हिंदी चित्रपट सृष्टीत आपले नाव कमावले, मात्र मराठी साहित्याची समीक्षा करणा-या समिक्षकांनी त्यांच्या साहित्याची दखल घेतली नाही. त्यामुळे समिक्षक आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यापासून दुरापास्तच राहिले असल्याची खंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केली.
लोकशाहिर आण्णाभाऊ साठे याच्या स्मृतिदिनानिमित्त झोपडपट्टी सुरक्षा दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या संघठनेतर्फे देशात ‘धर्म जाती भेदाच्या ताणतणावात आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य मानवतेचा दीपस्तंभ’ या विषयावर महाचर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्रीपाल सबनीस म्हणाले, सांगली जिल्ह्यातील वाटेगाव सारख्या खेडे गावातून आण्णाभाऊ साठे मुंबईला आले. त्यांचा मुंबईचा प्रवास थक्क करणारा आहे.
आण्णाभाऊंना प्रचंड संघर्षाला सामोरे जावे लागले. त्यांनी कधी घाटकोपर तर कधी चेंबुरला झोपडपट्टीत वास्तंव्य केलं. श्रमीक, वंचित, शोषीत हाच त्यांच्या विचारांचा आणि साहित्याचा गाभा राहिला. त्यामुळे श्रमिकांचा हुंकार म्हणजेच आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य होय. त्यांनी 35 कादंब-या लिहल्या. मार्क्सवादाचा झेंडा हाती घेतल्यानंतर आण्णाभाऊंनी जातीं-पातींच्या सर्व सिमारेषा ओलांडल्या. कथा, कादंब-या, कवी, वगनाट्य, पोवाडे आदी प्रकारचे साहित्य त्यांनी लिहले. सकारात्मक नायक आणि नायीका त्यांनी समाजात साकारली. केवळ एका जाती पुरतेच साहित्य न लिहता त्यांनी सर्वसमावेषक साहित्याची रचना केली. त्यांची लेखनी साता समुद्रापार गेली आहे. त्यांना मुंबईमध्ये राहण्यासाठी चॅंदबिबि या मुस्लिम महिलेने जागा दिली होती.