बहुजननामा ऑनलाइन टीम – देशात आजपासून जगातील सर्वात मोठे कोरोना व्हॅक्सीन अभियान सुरू झाले आहे. आज सुरू झालेल्या या अभियानासोबतच, आपण अमेरिका आणि ब्रिटनसह त्या देशांच्या श्रेणीत आलो आहोत, जिथे कोरोनाविरूद्ध लसीकरणाची सुरूवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आज देशातील पहिल्या टप्प्यातील कोविड-19 लसीकरण अभियानाची सुरुआत केली.
संपूर्ण देशात आज एकाचवेळी लसीकरण अभियानाची सुरुआत झाली आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये यासाठी एकुण 3006 लसीकरण केंद्र बनवण्यात आली आहेत. कोरोनाची लस दिल्यानंतर अनेक प्रकारच्या खबरदारीची आवश्यकता असेल, ज्यानंतर कोरोनाविरूद्धची लढाई जिंकणे शक्य होईल.
तज्ज्ञांनुसार, प्रत्येक व्यक्तीला लसीचे दोन डोस घेण्याची गरज आहे, तेव्हाच कोरोना व्हॅक्सीनचा परिणाम दिसू शकतो. पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस दिला जाईल. व्हॅक्सीनचा दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर कोरोनाविरूद्ध अॅटीबॉडी विकसित होते. याशिवाय कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा कोविड नियमांचे पालन करणे अनिवार्य आहे.
लस घेतल्यानंतरची खबरदारी
तज्ज्ञांनी सांगितले की, कोरोना व्हॅक्सीन घेतल्यानंतर सुद्धा कोरोनापासून वाचण्यासाठी सरकारकडून जारी करण्यात आलेल्या गाइडलाईनचे पालन करावे लागेल. कोरोना गाइडलाईननुसार, मास्क घालणे, सहा फुटांचे सुरक्षित शारीरीक अंतर ठेवणे आणि हात धुणे आवश्यक आहे. व्हॅक्सीन दिल्यानंतर सुद्धा जर या नियमाचे पालन केले तरच व्हायरसपासून बचाव होऊ शकतो.