भिलवाडा : वृत्तसंस्था – मुलाच्या लग्नासाठी 50 हून अधिक लोकांना आमंत्रित केल्यानंतर 15 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. संसर्गामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजस्थानमधील भिलवाडा जिल्ह्याचे जिल्हाधिकार्यांनी एका व्यक्तीला 6 लाख 26 हजार 600 रुपयांचा दंड ठोठावला आहे. राजस्थानमधील प्रशासनाने लॉकडाऊन कडक पाळला आहे. कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन अंतर्गत देण्यात आलेल्या सूचनांविषयी प्रशासन फारच सावध आहे.
लॉकडाऊनचे उल्लंघन करणार्यांचे मोठ्या संख्येने चलान कापली आहेत. राजस्थानात साथीच्या अध्यादेशाअंतर्गत आतापर्यंत 1 लाख 36 हजारांहून अधिक जणांवर कारवाई करुन 2 कोटी 35 लाखांहून अधिक दंड वसूल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावणार्या 66 हजारांहून अधिक लोकांकडून दंड वसूल करण्यात आला आहे.
तर सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्या 63 हजार लोकांचे चलान कापण्यात आले आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, मद्यपान करणे व गुटका-तंबाखू खाणार्यांविरोधात कठोर कारवाई देखील करण्यात आली आहे. त्याचवेळी मोठ्या प्रमाणात वाहने जप्त केली असून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांचा दंडही आकारण्यात आला असल्याची माहिती पोलीस महासंचालक बी.एन सोनी यांनी दिली.