चेन्नई : वृत्तसंस्था – सेल्फी काढताना विहिरीत पडून एका तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. तर तिच्यासोबतचा तरुण आणि तिचा होणारा नवरा रुग्णालयात आहेत. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच दोघांचा साखरपुडा झाला होता. चेन्नईतील पट्टबिरम भागातील असणाऱ्या शेतातील ही घटना घडली आहे. दोघेही काही दिवसांतच लग्नबंधनात अडकणार होते. परंतु सेल्फीने दोघांचाही घात केला.
समोर आलेल्या माहितीनुसार, टी मर्सी स्टेफी (24) या तरुणीचं डी अप्पू सोबत लग्न ठरलं होतं. दोघेही फिरण्यासाठी कांदिगाई गावातील शेतात फिरायला गेले होते. विहीरीच्या पायऱ्यांवर बसून हे कपल गप्पा मारत होतं. यावेळी ते एकमेकांचे फोटो घेऊ लागले. टी मर्सीला सेल्फी घ्यायचा होता. विहीरीच्या कठड्यावर बसून सेल्फी घेताना मर्सीचा तोल गेला आणि ती विहीरीत पडली. अप्पूचाही तिला वाचवण्याच्या नादात तोल गेला आणि तोही पाण्यात पडले.
यानंतर जीव वाचवण्यासाठी दोघेही आरडा ओरडा करू लागले. त्यांचा आवाज ऐकून एक शेतकरी विहिरीत उतरला आणि त्याने अप्पूला बाहेर काढले. परंतु मर्सीला वाचवण्यात खूप उशीर झाला. अखेर अग्निशमन दलाच्या जवानांना पाचारण करण्यात आले. त्यांनी मर्सीचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. अप्पूवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.
सेल्फीच्या नादात कोणी जीव गमावल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वी अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. काहींजण कड्यावरून घसरले आहेत तर काही दरीत कोसळले आहेत. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या या युगात तरुणाई मोठ्या प्रमाणात सेल्फीच्या आहारी जाताना दिसत आहे.