बहुजननामा ऑनलाईन – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे चिंतेत भर पडलेली असताना देशासाठी आणखी एक धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. कोरोनाच्या या लाटेमुळे देशात जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज 2 हजार 320 जणांचा मृत्यू होऊ शकतो, असा अंदाज इंडिया टास्क फोर्स सदस्यांच्या आयोगाच्या अहवालात व्यक्त केला आहे. लॅन्सेटमध्ये हा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
देशात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण येत आहे. अनेक ठिकाणी ऑक्सिजन, बेड, इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याने रुग्णांचे मृत्यू होत आहेत. देशात अशी भयानक परिस्थिती असताना आणखी एक भयावह अंदाज व्यक्त केला गेला आहे. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दररोज 1 हजार 750 लोकांचा मृत्यू होऊ शकतो. तर जूनच्या पहिल्या आठवड्यात दररोज 2 हजार 320 लोकांचा मृत्यू होईल असे अहवालात म्हटले आहे. भारतातील दुसऱ्या कोरोना लाटेच व्यवस्थापन तातडीचे उपाय या नावाने हा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. अहवालात कोरोनाच्या प्रमुख मुद्द्यांवर प्रकाश टाकला आहे. कोरोनाचा संसर्ग कमी करण्यास परिणामकारक ठरणाऱ्या उपाययोजनांचीही शिफारस केली आहे. कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेपेक्षा वेगळी असल्याचे अहवालात म्हटले आहे.