मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी आणि लोकांकडून नियमांचे पालन करून घेण्यासाठी प्रशासनाने चांगलीच कंबर कसली आहे. कोरोनाकाळात संक्रमणापासून बचावासाठी मास्कचा शस्त्राप्रमाणे वापर केला जात आहे. आता मास्कच्या वापराबाबत मुंबई पालिकेकडून लोकांना आपला मास्क विचारपूर्वक निवडा असे संदेश दिला आहे.
आपला मास्क विचारपूर्वक निवडा!
सर्व प्रकारचे मास्क सारख्याच प्रमाणात सुरक्षित असतील असे नाही. विविध प्रकारच्या मास्कविषयी जाणून घ्या.#NaToCorona pic.twitter.com/HiT5ZkJqjJ
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 30, 2021
तुम्ही कापडाचा मास्क वापरत आहात का? असा प्रश्न या ट्विटच्या माध्यमातून विचारला गेला आहे. त्यानंतर जर तुम्ही कापडाचा मास्क वापरत असाल तर त्याच्या आत सर्जिकल मास्क असायला हवा. तरच व्हायरसपासून संरक्षण मिळेल, असा संदेश दिला आहे. तसेच कोणता मास्क वापरल्याने कितपत संरक्षण मिळत हे सुद्धा सांगितले आहे. त्यानुसार सर्जिकल मास्क आणि एन-95 मास्क वापरल्याने कोरोना व्हायरसपासून 95 टक्के संरक्षण मिळते.
तर कापडाचा मास्क वापरल्याने 0 टक्के संरक्षण मिळते, असा दावा पोस्टद्वारे केला आहे. दरम्यान मुंबईत रुग्णसंख्येत मोठी घट होताना दिसत आहे. मुंबईत 21 एप्रिल रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 84 हजार 743 असल्याची नोंद होती. त्यात घट होऊन 24 एप्रिल रोजी हे प्रमाण 78 हजार 775 वर आले. 24 एप्रिलनंतर रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असलेली दिसून आली. परिणामी उपचाराधीन रुग्णसंख्येचा आलेख उतरताना दिसून येत आहे. 29 एप्रिल रोजी थेट आकडा 65 हजारांच्या खाली गेल्याची नोंद झाली आहे.