मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – विधानपरिषदेचे दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या धोरणावर टीका केली. महाराष्ट्रात सध्या कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. खऱ्या मदतीची अपेक्षा आत्ताच आहे. पण केंद्र सरकार कुठली मदत द्यायला तयार नाही, असा दावा राजेश टोपे यांनी केला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी कोरोना साथीसाठी आवश्यक सुविधा नाहीत. कोरोना काळात काही खासगी दवाखाने आणि डॉक्टर कोविड सेंटर सुरु करुन लुट करत आहे. यावर ठाकरे सरकारचं नियंत्रण नसल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत पुरवणी प्रश्नांवर चर्चेच्या वेळी केला. राज्यातील कोरोनाची परिस्थिती भीषण असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केल्यानंतर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला.
राजेश टोपे म्हणाले, कोरोना साथरोगाच्या काळात सरकार सर्व प्रकारे साथ आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत, असा दावा टोपे यांनी केला. तसेच अँटिजेन टेस्ट वाढवाव्यात यासाठी किट खरेदी करण्याचाही सरकारचा विचार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी यावेळी दिली. राजेश टोपे यांनी कोरोना काळात राज्य सरकार काय उपाययोजना करत आहे याची माहिती सभागृहाला दिली. त्याच वेळी केंद्र सरकारकडून मदत मिळत नसल्यांचेही सांगितले.
राजेश टोपे पुढे म्हणाले, खरी गरज असतानाच केंद्राने पाठ फिरवली आहे. मोदी सरकारने राज्य सरकारला कोविड संदर्भात मिळत असलेली मदत बंद केली आहे. आत्ताच कोरोना साथीचा विस्फोट होत असताना केंद्राकडून खरी अपेक्षा होती. मात्र, नेमकी आत्ताच मोदी सरकारकडून राज्याला काही मदत मिळत नाही. पंतप्रधानांच्या ब्लू आईड बॉय (लाडक्या नेत्याने) यात लक्ष घालावं, असा टोला राजेश टोपे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लगावला.