मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत होत असलेली घट कायम आहे. सोमवारी (दि.21) राज्यात 6 हजार 53 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (patients Discharged Today) देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांमधील ही सर्वात जास्त संख्या आहे. आजपर्यंत राज्यात 17 लाख 89 हजार 958 रुग्णांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट (Recovery Rate) 94.24 वर गेला आहे. तर दिवसभरात 2 हजार 834 नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या 24 तासामध्ये 55 जणांचा मृत्यू झाला असून राज्यात कोरोनामुळे मृत्यू होण्याचा दर 2.57 इतका आहे. तर कोरोना रुग्णांची संख्या ही 18 लाख 99 हजार 352 एवढी झाली आहे.
राज्यात आज 2834 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 6053 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1789958 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 59469 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.24% झाले आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) December 21, 2020
राज्यात उद्यापासून रात्र संचारबंदी
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खबरदारीच्या उपाययोजनांसाठी बैठक घेतली. राज्यात उद्यापासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ५ जानेवारीपर्यंत ते लागू राहील. त्याचबरोबर संपूर्ण युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाईन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी यावेळी सांगितले.