नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात अचानक उद्भवलेल्या कोरोना संकटामुळे आणि त्याला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला. देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊन वाढवण्यात आला असून 17 मे पर्यंत हा लॉकडाऊन सुरु राहणार आहे. देशव्यापी लॉकडाऊनमुळे अनेकांची कामं रखडली आहेत. परंतु सर्वात मोठा पेच निर्माण झाल तो लग्नघरांमध्ये.
लॉकडाऊनच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात अनेक जणांनी आपले विवाह पुढे ढकलले तर काहींनी अगदी हातावर मोजण्याइतक्या कुटुंबियांसोबत हा सोहळा पार पाडला. काही महाभागांनी एकटेच जाऊन लग्न सोहळा उरकला. परंतु आता लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याचे जाहीर करताना केंद्र सरकारने विवाहसोळ्यांनाही ध्यानात घेऊन काही निर्देश दिले आहेत.
दोन्ही कुटुंबातील फक्त 50 लोकं
लॉकडाऊनचा तिसरा टप्पा 4 मे पासून सुरु होत आहे. तिसऱ्या टप्प्यात लग्नघरांना थोडी सूट दिली आहे. लॉकडाऊन दरम्यानही विवाहांना परवानगी देण्यात आली आहे, परंतु काही अटी देखील घालण्यात आल्या आहेत. यातील महत्त्वाची अट म्हणजे वर आणि वधू या दोन्ही कुटुंबातील फक्त 50 व्यक्तींनाच विवाहाला हजेरी लावता येईल.
अंत्यविधिला 20 जणांना परवानगी
लॉकडाऊन दरम्यान विवाह सोहळ्याला परवानगी दिली आहे. तर दुसरीकडे अंत्यविधीसाठी मात्र अगोदरप्रमाणेच केवळ 20 जणांना उपस्थित राहण्याची परवानगी असणार आहे.
ग्रीन – ऑरेंज झोनमध्ये ई – कॉमर्सला सूट
लॉकडाऊनचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. रेड झोनमध्ये निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. तर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये लॉकडाऊनचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले आहेत. गृह मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या निर्देशानुसार, ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये ई – कॉमर्सला परवानगी देण्यात आली आहे. यामध्ये अत्यावश्यक वस्तूंमध्ये न येणाऱ्या वस्तूंचीही ऑनलाईन डिलिव्हरीसाठी परवानगी देण्यात आली आहे.
एनपी न्यूज 24 नेटवर्क