नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. सध्या भारतातील कोरोनाचे रुग्ण 14 लाखांच्या वर गेले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाची लागण पसरतच आहे. आता महाराष्ट्र आणि दिल्लीनंतर बिहार, पश्चिम बंगाल, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्ये कोरोनाने चांगलाच जोर धरलेला दिसतोय. विशेष म्हणजे काल रविवारी एका दिवशी भारतात कोरोनाचे जवळपास 50 हजार रुग्ण सापडले आहेत. मागील 24 तासांत कोरोनाचे भारतात एकूण 49 हजार 931 रुग्ण सापडून 708 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनामुळे होणारी बिकट स्थिती आपल्याला पुढील आकड्यांवरुन समजेल. पहिल्या 110 दिवसांत भारतात कोरोनाचे 1 लाख रुग्ण झाले होते. आता 179 व्या दिवशी भारतात तब्बल 14 लाखांच्या वर कोरोनाचे रुग्ण आहेत. म्हणजे 69 दिवसंत 13 लाख रुग्ण वाढले आहेत. काल भारतात अमेरिका आणि ब्राझील पेक्षा जास्त कोरोनाचे बळी गेले आहेत.
सध्या भारतात सगळ्यात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात 1 लाख 40 हजार रुग्ण रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू नंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. ऍक्टिव्ह केसच्या बाबतीत सध्या भारताचा तिसरा क्रमांक लागतोय. महाराष्ट्रात रविवरपर्यंत कोरोनाचे पावणे चार लाख रुग्ण सापडले आहेत. रविवारी एकाच दिवशी 9,431 नवीन रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत आणि 267 लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत 13656 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून तसेच महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 56.74 टक्के आहे.
भारत कोरोनाच्या आकडेवारीत सध्या अमेरिका आणि ब्राझीलनंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिका (4,371,276) आणि ब्राझीलमध्येही (2,419,901) कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 63.5 आणि मृत्युदर 2 टक्के आहे. जगाच्या तुलनेत भारताची कोरोनाची आकडेवारी दिलासा देणारी आहे.