नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जितक्या वेगाने वाढत आहे तितक्याच वेगाने आता कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. देशात कोरोना विषाणूमुळे आत्तापर्यंत 62,550 लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांचा विचार केला तर, एका दिवसात 1021 लोकांचा मृत्यू झाला आहे. आता मृत्यूच्या बाबत देखील भारत जगात तिसऱ्या स्थानी पोहचेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांत कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या एक-दोन दिवसात भारत अमेरिकेलाही मागे टाकू शकतो.
संपूर्ण जगात आत्तापर्यंत कोरोनामुळे अमेरिकेत 1 लाख 85 हजार 905, ब्राझीलमध्ये 1 लाख 19 हजार 594 लोकांचा मृत्यू झाला आहे. मेक्सिको भारताच्या थोडासाच पुढे आहे. तिथं 63 हजार 146 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात आत्तापर्यंत 10 लाख लोकांमागे 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अमेरिका आणि ब्राझीलमध्ये 10 लाख लोकांमागे 559 रुग्णांचा मृत्यू होत आहे.
तर जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) पुन्हा एकदा सूचना दिली आहे की, येणाऱ्या काही दिवसांत युरोप सोबत जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचे संक्रमण वाढेल. WHO ने सांगितले की दरम्यान कोरोना रुग्णांचे हॉस्पिटल मध्ये जाण्याचे प्रमाण वाढेल, आणि मृत्यूची संख्या देखील वाढेल. युरोपमध्ये डब्ल्यूएचओचे रिजनल डायरेक्टर हेनरी क्लग यांनी सांगितले की, ‘थंडीच्या दिवसात तरुणवर्ग वयोवृद्ध लोकांच्या अधिक जवळ असेल त्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याची शक्यता आहे तसेच मृत्यूचे प्रमाण वाढण्याचा देखील अधिक धोका आहे.’
महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अधिक दिसून येत आहे. शुक्रवारी कोरोनाचे 14,331 नवे रुग्ण सापडले. आत्तापर्यंत 7,47,995 लोकांना कॉरोनाची लागण झाली असून 23,775 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. मागील 24 तासात 331 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 1,80,718 रुग्णांवर उपचार सुरु आहे. शुक्रवारी 11,607 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, आत्तापर्यंत 5,43,170 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.