पटना : वृत्तसंस्था – देशात कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान लाखो मजूर विविध राज्यात अडकून पडले होते. त्या मजुरांना लॉकडाऊनमध्ये थोडीशी शिथिलता मिळाल्यानंतर केंद्र सरकारने आपल्या राज्यात परतण्याची परवानगी दिली आहे. तसंच या मजुरांसाठी स्पेशल गाड्या चालवल्या जात आहे. मात्र या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी केंद्र सरकारकडून भाडेवसूली करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे. यावेळी परराज्यातून येणाऱ्या मजुरांबाबत नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील बिहार मधील सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
“परराज्यात अडकलेल्या बिहारी लोकांना माघारी पाठविण्याबाबत केंद्र सरकारला दिलेल्या प्रस्तावाचा विचार केल्याबद्दल मी केंद्र सरकारला धन्यवाद देतो. तसंच परराज्यातून स्पेशल गाड्यांमधून येणाऱ्या मजुरांकडून कोणत्याही प्रकारचे भाडे आकारले जाणार नाही, या मजुरांना सुरुवातीस क्वारंटाईन करण्यात येईल. त्यांनतर या सर्व मजुरांना एक हजार रुपये मदत म्हणून देण्यात येतील.” असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
ही रक्कम बिहार सरकारमार्फत दिली जाईल. या योजनेंतर्गत बिहार सरकारने आतापर्यंत १९ लाख मजुरांना याआधी प्रत्येकी एक हजार रुपये दिले होते. दरम्यान, बाहेर राज्यातून आलेल्या सर्व प्रवासी मजुरांना २१ दिवसांपर्यंत क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात येईल, असं नितीश कुमार यांनी सांगितलं.
बिहारमध्ये सध्या कोरोना संसर्गाचे ५०३ रुग्ण सापडले आहे. तर ४ जणांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला आहे. देशात कोरोना संसर्गाचे आतापर्यंत ४२ हजार ५३३ रुग्ण सापडले आहे. त्यापैकी ११ हजार ७०७ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आलं. तर १३७३ रुग्णांचा मृत्यू कोरोना संसर्गामुळे झाला. सध्याच्या घडीला देशात २९ हजार ४५३ कोरोना संसर्गित रुग्ण आहे.
एनपी न्यूज24 नेटवर्क