बीजिंग : वृत्तसंस्था – चीनमध्ये कोरोना व्हायरस मुळे हाहाकार माजला आहे. मृतांचा आकडा ११०० च्या वर पोहचला आहे. चीनमधील व्यापार ठप्प आहे. चीन मधल्या कोरोना व्हायरसचा परिणाम केवळ आरोग्यावर झाला नाही तर मोठ्या प्रमाणात जागतिक बाजारपेठांवर देखील झाला आहे. चीनशी अनेक देशांचा व्यापार चालतो. याचा भारतावरही मोठा परिणाम झाला आहे. भारतात औषधांची टंचाई निर्माण होण्याची भीती आहे.
एप्रिल महिन्यापर्यंतच औषधांचा साठा उपलब्ध
भारतात मोठ्या प्रमाणावर चीन मधून औषधे आयात केली जातात. मिळालेल्या माहितीनुसार भारतात सध्या फक्त एप्रिल महिन्यापर्यंतच औषधांचा साठा उपलब्ध असल्याची माहिती आहे. चीनमधील वुहान प्रांतात औषधांशी संबंधित अनेक कंपन्या आहेत. या प्रांतातच करोनाने मोठ्या प्रमाणावर थैमान घातले आहे. त्यामुळे वुहानमधील व्यवहार ठप्प झाले आहेत. वुहानमधील कंपन्यांमधून कच्चा मालाच्या रुपात औषधे तयार केली जातात आणि जगभरातील विविध ठिकाणी पाठवली जातात. भारतातही औषधांसाठीचा कच्चा माल हा चीनमधून आयात होतो. त्याचे जवळपास ८० टक्के प्रमाण आहे. चीनमधून भारतात जवळपास ५७ प्रकारचे मॉल्युक्यूल्स आयात होतात. फक्त औषधेच नव्हे तर शस्त्रक्रियांसाठी लागणारे ९० टक्के उपकरणे, साहित्य देखील चीनमधून आयात केली जातात.
कच्चा माल न आल्यास गंभीर परिस्थितीची शक्यता
करोनामुळे चीनमधील विशेषत: वुहानमधील औषध कंपन्यांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. त्याचा परिणाम थेट भारतातील औषध साठ्यावर झाला आहे. भारतात औषधांच्या किंमतीत वाढ होऊ नये यासाठी केंद्र सरकारने एक समिती गठित केली आहे. येत्या एक महिन्यात चीनमधून औषधांसाठी आवश्यक असणारा कच्चा माल न आल्यास देशात गंभीर वैद्यकीय परिस्थिती निर्माण होण्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे.