नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोनाबाधितांची संख्या देशात वाढत चालली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लसीकरणाचाही महाराष्ट्र सरकारने वेग वाढवला आहे.
६ एप्रिलपर्यंत ८५.६ लाख लोकांचे लसीकरण केले असून बुधवारी महाराष्ट्राने ४.३० लाख लस दिल्या. एकाच आठवड्यात लसीकरण दुप्पट झाले असून रोज ४ लाख लोकांना लस दिली जात आहे. २.२० लाख लसीकरण ३१ मार्च रोजी झाले होते, तर ४.४० लाख ५ एप्रिल रोजी झाले आहे.
दरम्यान, कोरोनाचा वाढता आलेख पाहाता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला १८ वर्षे आणि त्यापुढील वयाच्या लोकांना लस दिली जावी अशी विनंती केली होती. मात्र अजूनपर्यंत हि विंनती मेनी झाली नाही. दुसरीकडे सीरम इन्स्टिट्यूट (काेविशिल्ड) आणि भारत बायोटेकची (कोव्हॅक्सिन) लस उत्पादित करण्याची सध्याची क्षमता अपुरी आहे. त्यामुळे सर्वाना लस दिली जाऊ शकत नाही, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे. ६ एप्रिलपर्यंत भारताने १७० दशलक्ष (८.७५ कोटी) लस मात्रा दिल्या आहेत. ४५ वर्षांच्या वरील सर्व ३० कोटी लोकांना लस देण्याचे लक्ष्य ठरवले आहे. यात तीन कोटी आरोग्य आणि फ्रंटलाइन वर्कर्सचा समावेश असून अतिरिक्त ४३० दशलक्ष डोसेसची गरज आहे.
लसीची अतिरिक्त मागणी पूर्ण करण्यासाठी दोन पुरवठादारांना सात महिने लागतील. त्यातच जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांना लस निर्यातीची सिरमकडे मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे लसीचा पुरवठा वाढवायचा असेल तर सध्याची लस उत्पादन क्षमता वाढवने आणि बाजारात नव्या लसी येण्याची अपेक्षा करणे एवढेच उरले आहे.
६ एप्रिल रोजी महाराष्ट्रात कोरोना रुग्णवाढीचा दर १४.९ टक्के आहे. हा दर खाली आणायचा झाल्यास लसीकरण दुप्पट करावे लागेल. महाराष्ट्रातील कोरोना रुग्णवाढीचा दर हा देशात सर्वोच्च असून, मृत्यू होण्याचे प्रमाण १.८ टक्के आहे.
लसीच्या आवश्यकतेवरून वाद हास्यास्पद : राहुल गांधी
नवी दिल्ली : सुरक्षित जीवन जगण्याचा प्रत्येक भारतीयाला हक्क आहे. मात्र कोरोना लसीबाबत वादविवाद करणे हास्यास्पद असल्याचे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोविड व्हॅक्सिन हॅशटॅगने ट्वीट करत म्हंटले. तसेच सर्व नागरिकांना लस मिळाली पाहिजे, असे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, देशात सध्या लसीकरण सुरू असून, आता ४५ वर्षांवरील लोकच लस घेऊ शकतात. आवश्यकता आणि इच्छा याबाबत वादविवाद करणे हास्यास्पद आहे.
महाराष्ट्रातील रोजची लसीकरण संख्या
३१ मार्च- २.२० लाख
एक एप्रिल- १ ३.१० लाख
दोन एप्रिल- ५.१० लाख
तीन एप्रिल- ३.३० लाख
चार एप्रिल- ३.३० लाख
पाच एप्रिल- ४.४० लाख
सहा एप्रिल- ४.३० लाख