नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत चीन सीमेवर घडलेल्या घटनेचा परिणाम अयोध्येतील राम मंदिराच्याही कामावर झाला आहे. सीमेवरच्या वाढत्या तणावामुळे राम मंदिराच्या उभारणीचे काम लांबणीवर पडले आहे. राम मंदिर ट्रस्टने अधिकृतपणे ही तारीख पुढे ढकलल्याचे जाहीर केले आहे. भारत चीन सीमेवरची स्थिती ही चिंताजनक असून देशाचे रक्षण ही पहिली प्राथमिकता आहे. त्यामुळे काही दिवसांसाठी मंदिर निर्मितीचं काम पुढे ढकलले जात असून स्थितीचा आढावा घेतल्यानंतर नवी तारीख जाहीर केली जाईल असे मंदिर ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले आहे.
सुप्रीम कोर्टाने गेल्या वर्षी वादग्रस्त जागेवर मंदिर निर्मितीस हिरवा कंदील दिला होता. मंदिर निर्मितीच्या कामासाठी राम मंदिर ट्रस्टवर कोर्टाच्याच आदेशाने जबाबदारी सोपवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून मंदिर निर्मितीचे काम कधी सुरु होणार याबाबत चर्चा सुरु होती. मात्र आता भारत चीन सीमेवर वाढलेल्या तणावामुळे मंदिर निर्मितीचे काम पुढे ढकलण्यात आले आहे. अयोध्या शहरात काल काही हिंदुत्ववादी संघटनांनी चीनविरोधी निदर्शनेही केली होती. चिनी मालाची होळी, चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्या पुतळ्याची होळी करण्याचे काम विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी केले. त्यामुळे आता मंदिर निर्मितीच्या शुभारंभाची नवी तारीख काय असणार याची उत्सुकता आहे.