पुणे : बहुजननामा ऑनलाईन – भारत हा विविधतेने नटलेला देश आहे आणि भारताची धर्मनिरपेक्षता, संस्कृती आणि इतिहास गौरवशाली आहे. सध्या संविधानात असणारा ‘इंडिया’ या नावातून परकेपणा जाणवतो, त्यामुळे भारतीय संविधानामध्ये दुरुस्ती करून ‘इंडिया’ ऐवजी ‘भारत’ हा शब्द वापरला जावा, असा ठराव स्वदेशी जागरण मंचाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. मंचाचे राष्ट्रीय सहसंयोजक डॉ. अश्विनी महाजन यांनी ही माहिती दिली.
नियोजन आयोगाने एकाच प्रकारची योजना संपूर्ण देशात राबवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे योजना आयोग बदलून नीती आयोग स्थापन करण्याचा निर्णय योग्यच होता. मात्र, नीती आयोगाच्या कार्यपद्धतीवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. आयोगाच्या प्रस्तावांमध्ये ‘हितसंबंधांचा संघर्ष’ होत असल्याची टीका त्यांनी केली.
शेतकरी, दुकानदार, लघु उद्योजक यांचे आयोगामध्ये कमी प्रमाणात प्रतिनिधित्व पाहायला मिळते. कॉर्पोरेट कंपन्या, परदेशी कंपन्या जास्त पाहायला मिळतात. आयोगाच्या निर्णयांमध्ये बहुराष्ट्रीय कंपन्यांचे हित पाहिले जाते, याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. अन्न प्रक्रिया क्षेत्रात एफडीआय अयोग्य असून यामुळे ‘वॉलमार्ट’सारख्या बहुराष्ट्रीय कंपनीच्या हिताचा विचार केला जात आहे.