मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात आगामी विधानसभा निवडणूकीत सर्व समविचारी पक्षांना कॉंग्रेस राष्ट्रवादी आघाडीसोबत एकत्र करण्यासाठी त्यांच्याशी संवाद साधण्याचा निर्णय मंगळवारी कॉंग्रेस राष्ट्रवादीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी समविचारी पक्षांच्या नेत्यांना पत्र दिले जाणार आहे. त्या पत्राला प्रतिसाद मिळाल्यानंतरच पक्षांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे ठरले आहे.
कॉंग्रेस राष्ट्रवादीला विधानसभा निवडणूकीत महायुतीचे आव्हान आहे. तर त्यासोबतच राज्यातील काही छोट्या पक्षांचेही आव्हान आहे. त्यामुळे काल काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांची बैठक विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या सरकारी निवासस्थानी बैठक पार पडली.
आगामी विधानसभा निवडणूकीत राज्यात महायुतीचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीला समविचारी पक्षांना सोबत घेण्याची गरज आहे. त्यानुसार वंचित बहुजन आघाडी, बहुजन विकास आघाडी, रिपब्लीकन पक्षाचे विविध गट, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभीमानी पक्ष, समाजवादी पक्ष, जनता दल या सर्व पक्षांच्या नेत्यांना पत्र लिहिण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
तर जागावाटपाच्या फॉर्म्यूल्यावरही चर्चा या बैठकित झाली नाही. विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात आघाडीचा मुख्यमंत्री बासवा यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. मित्र पक्षांना किती जागा द्यायच्या कोणाला सोबत घ्यायचे याचा निर्णय पुढे घेण्यात येईल मात्र मनसेबाबत कोणतीही चर्चा अद्याप करण्यात आलेली नाही. अशी माहिती प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी दिली.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, शरद रणपीसे, नसीम खान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, जितेंद्र पवार, जितेंद्र आव्हाड आदी नेते या बैठकिला उपस्थित होते.