पुणे बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला महत्व न दिल्याने पराभूत झालेली कॉंग्रेस विधानसभा निवडणूकीत वंचितसमोर नमले आहे. काँग्रेसला आता विधानसभा निवडणुकीसाठी ‘ वंचित’ चा आधार घेण्याशिवाय पर्याय नसल्याने बुधवार दि. ३ जुलै रोजी काँग्रेसची वंचित बहुजन आघाडीशी बोलणी होणार आहे. यावेळी कोणाला किती जागा यासाठी चर्चेची ही प्राथमिक फेरी होणार आहे.
राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसला आता ‘ वंचित’ ची ताकद कळली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीबरोबर आघाडी असणाऱ्या काँग्रेसला वंचित आघाडीचाही आधार कसा मिळेल यासाठी पक्षाच्या नेतृत्वाने रणनीती आखली आहे. त्यानुसार २५ ते ३० जागा वंचित आघाडीला देण्याची तयारी काँग्रेसने केली आहे; पण वंचित आघाडीने ५० जागांची मागणी काँग्रेसकडे केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
जागांची बोलणी करून ‘एका दगडा’तच्या धर्तीवर सत्ताधारी भाजपला गारद करताना राष्ट्रवादीलाही अप्रत्यक्ष शह देण्यासाठी वंचित आघाडीबरोबर सूत जुळविण्यासाठी काँग्रेसने ही खेळी खेळल्याचा अंदाज राजकीय निरीक्षकांचा आहे.राष्ट्रवादीबरोबर भविष्यात आघाडी कायम राहील असा सूर आळवणाऱ्या काँग्रेसने ‘वंचित’बरोबर आघाडी करण्याचा मार्ग मोकळा केला असून तसा प्रस्तावही तयार केला आहे. पण या २५ ते ३० जागांच्या प्रस्तावाला ‘वंचित’ कितीपत प्रतिसाद देते हे ३ जुलै रोजी होणाऱ्या बैठकीनंतर स्पष्ट होणार आहे.
काँग्रेसकडून ‘वंचित’चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्याबरोबर होणाऱ्या चर्चेची जबाबदारी हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे, अशोक चव्हाण यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यामुळे ३ जुलै रोजी प्राथमिक चर्चा सफल होते की फिस्कटते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.