बहुजननामा ऑनलाईन टीम : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-कॉंग्रेस-राष्ट्रवादी या तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मात्र, पाच वर्षात सहमतीने सरकार चालवण्याचे मोठे आव्हान या तीन पक्षांसमोर असणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तयार झालेल्या राजकीय स्थितीमुळे राज्यात ऐतिहासिक आघाडीचा उदय झाला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षातील मंत्र्यांना घराचे वाटप करण्यात आले आहे. पण कॉंग्रेस मंत्री अजूनही वेटींगवर असल्याने पक्षात नाराजी असल्याचे दिसत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल ४ मंत्री आणि १ विरोधी पक्ष नेत्यांच्या शासकीय निवासस्थानचे वाटप केले. यामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे मंत्र्याची नावे होती. मात्र, कॉंग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री बाळासाहेब थोरात आणि नितीन राऊत यांनाच घराचे वाटप करण्यात आले नाही. शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अद्याप खात्याचे वाटप तर नाहीच पण शासकीय निवासस्थान वाटप झाले नसल्याने कॉंग्रेस पक्षात नाराजी असल्याची माहिती एका वरिष्ठ नेत्याने दिली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे जयंत पाटील, छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना शासकीय निवासस्थानाचे वाटप करण्यात आलं आहे. पण बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना मात्र अद्यापही शासकीय निवासस्थान दिले गेले नाही.
राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आपल्या समर्थकांचा नंबर लागावा म्हणून राज्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते सोनिया गांधी यांच्या दरबारात आले आहेत. कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते आणि कॅबिनेट मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काल सायंकाळी कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली. बाळासाहेब थोरात आणि सोनिया गांधी यांच्यात जवळपास तीस मिनिटे झालेल्या भेटीमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाल्याचा दावा थोरात यांनी केला आहे. नवनियुक्त विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे देखील दिल्लीमध्ये आले असून ते सोनिया गांधीची भेट घेणार आहे. सोबतचे कॉंग्रेसचे दुसरे कॅबिनेट मंत्री नितीन राऊत हे देखील दिल्लीत येण्याची शक्यता असून ते पण कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
Visit : bahujannama.com