मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी हप्तावसुलीचे टार्गेट दिले होते, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे. या प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला असून पोलीस बदल्यांबाबत त्यांनी राज्यपालांची भेट घेतली आहे. यावर काँग्रेसने प्रत्युत्तर दिले आहे. वसुली कशी करतात? त्यात वाटा किती असतो? त्याचे वाटप कसे होते? याचा दांडगा अनुभव फडणवीसांना असून ते त्यांचा अनुभव कथन करत आहेत. 5 वर्ष सत्तेत असताना मंत्रालयात आरएसएसचे कार्यकर्ते कसे घुसवले होते. ते किती वसुली करत होते व त्यातला किती वाटा आरएसएसला जात होता याची चौकशी करण्याची मागणी आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटून करणार असल्याचे सडेतोड उत्तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्य़क्ष नाना पटोले यांनी दिले आहे.
नाना पटोले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना फडणवीस यांनी केलेल्या आरोपाचा चांगलाच समाचार घेतला. फडणवीस सत्तेत असताना रश्मी शुक्लासारख्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून कोणाला किती वाटा द्यायचा याचा मोठा अनुभव मिळवलेला आहे. भाजपाने IAS, IPS अधिकाऱ्यांवर केंद्राचा दबाव आणून सत्तेचा गैरवापर करत आहे. फडणवीस हे स्वतःच जज असल्याच्या भूमिकेत वावरत आहेत. सरकारला बदनाम करण्यासाठी कधी अधिकारी तर कधी राजभवनच्या माध्यमातून भाजपाचे असे उद्योग सुरु असल्याचे पटोले म्हणाले. परमबीर सिंग यांच्यावर कालपर्यंत हेच भाजपवाले टीका करत होते. तर आता ते त्यांचे प्रिय कसे झाले? ते कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. मी सरकारमध्ये असतो तर परमबीर सिंगांच्या वर्तणुकीनंतर त्यांची बदली केली नसती तर थेट निलंबित केले असते, असे पटोले म्हणाले.