मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बुधवारी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला. आम्हाला हिंदुत्व शिकवू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपचा समाचार घेतला. स्वातंत्र्यवीर सावरकर, औरंगाबादचं नामांतर, राम मंदिर यांच्यासारख्या अनेक विषयांवरून मुख्यमंत्र्यांनी भाजपला लक्ष्य केलं.
बाबरीचा वादग्रस्त ढाचा पाडला गेल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेचा दाखला देत त्यांनी भाजपवर निशाणा साधला. यावरून आता काँग्रेसचे माजी खासदार संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचा समाचार घेतला.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत बाबरी मशिदीच्या विध्वंसाबद्दल आनंद साजरा केला. त्यावेळी तिथे उपस्थित असलेले काँग्रेस आणि एनसीपीचे मंत्री आणि आमदार त्यांच्या भाषणाचा आनंद घेत होते. हा हा कोणता किमान समान कार्यक्रम? ओवैसींच्या विषारी रोपट्याच्या वाढीला यातूनच खतपाणी मिळत नाही की का?,’ असे प्रश्न निरुपम यांनी ट्विटमधून उपस्थित केले आहेत.
दरम्यान, ‘विरोधक बाळासाहेबांची वेळोवेळी आठवण काढतात. त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. निदान त्यांना तरी विसरला नाहीत. त्यांना विसरणार नसाल, तर त्यांचं हिंदुत्व लक्षात ठेवा. ते शेंडी-जानव्याचं हिंदुत्व नव्हतं. बाबरी पाडली तेव्हा येरेगबाळे पळून गेले होते. पण बाळासाहेब एकटे उभे राहिले होते.
आता विषय असा आहे की बाबरी कोणी पाडली ते आम्हाला माहीत नाही. पण शिवसेनाप्रमुख म्हणाले होते, बाबरी पाडणारे जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. केवळ अभिमान नाही, तर गर्व आहे. सहा वर्षात केंद्रात सत्ता असताना राम मंदिरासाठी कायदा केला नाही. राम मंदिराचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला. आता घरोघरी जाऊन मंदिरासाठी पैसे मागत आहेत. म्हणजे पैसे जनता देणार. पण नाव यांचं येणार,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी भाजपला आणि मोदी सरकारवर निशाणा साधला.