नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी अभिनेते अमोल पालेकर प्रकरणावरून मोदी सरकारवर निशाणा साधला. नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, मुंबई येथील कार्यक्रमादरम्यान सरकारवर टीका करणारे भाषण केल्याने अभिनेते अमोल पालेकर यांना मध्येच रोखण्यात आले होते. याचाच संदर्भ देत कोणावर देशद्रोहाचा खटला दाखल करणे, कोणाला बोलूच न देणे हाच मोदींचा नवा भारत असल्याची जहरी टीका सिब्बल यांनी केली.
पंतप्रधान मोदींनी अशाच अच्छे दिनाचे आश्वासन दिल्याची खिल्लीही त्यांनी यावेळी उडवली. एखाद्या वक्त्याने काय बोलावे काय नाही याची माहिती त्याला आधी द्यायची असते, मात्र मला तसे सांगण्यात आले नव्हते. एनजीएमएमधील कार्यक्रमात या संस्थेत झालेल्या बदलांवर बोलणे हे औचित्यभंग कसे असू शकते ? असा सवाल उपस्थित करत ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनीही नाराजी व्यक्त केली होती.