लातूर : बहुजननामा ऑनलाइन – भाजपला पराभूत करायचे असेल तर काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा. काँग्रेसची आज एवढी ताकद नाही की ते भाजपला हरवू शकतात असे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
लातूर येथे माध्यमांशी संवाद साधतांना आंध्र प्रदेश सरकारने आणि पश्चिम बंगाल सरकारने, सीबीआयला राज्यात ढवळाढवळ करु नये, अशी नोटीस दिली होती. त्यामुळे कायदेशीरित्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कारवाई योग्य आहे. कायदा सुव्यवस्था राज्यातील मुद्दा आहे. अशावेळी केंद्र सरकार सुप्रीम कोर्टाकडून परवानगी घेऊन किंवा राज्यपालांच्या मदतीने कारवाई करु शकते. त्यामुळे ममता बॅनर्जींचे वागणे घटनेप्रमाणे आहे. त्यामुळे त्यांना माझा पूर्ण पाठिंबा आहे. त्यांना गरज पडली तर मी कोलकात्याला जाणार असेही त्यांनी म्हंटले.
याचबरोबर, आगामी निवडणुकांच्या संदर्भात होणाऱ्या महाआघाडी बाबतही त्यांनी वक्तव्य केले आहे. जागा वाटप हा मुद्दा नाही. काँग्रेस ज्या जागांवर पराभूत झाले आहे त्या जागांवर आम्ही उमेदवारी मागत आहोत. भाजपला पराभूत करायचे असेल तर काँग्रेसने आम्हाला पाठिंबा द्यावा. काँग्रेसची आज एवढी ताकद नाही की ते भाजपला हरवू शकतात, असेही त्यांनी म्हंटले.
विशेष म्हणजे, वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व ४८ लोकसभेच्या जागा लढवणार आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले. इतकेच नव्हे तर, अकोल्यातून निवडणूक लढवणार नसल्याचे संकेतही त्यांनी दिले.