अकोला : बहुजननामा ऑनलाईन – काँग्रेसमध्ये ज्या जिल्ह्यात सहा वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून एकच अध्यक्ष आहे, तेथे पक्ष नेतृत्वात बदल करून नव्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होणार आहे. राज्यात नवीन टीम तयार करण्याच्या मनःस्थितीत काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. त्यामुळे जिल्हाध्यक्षांसाठी इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत.
काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकताच महानगरपालिका व जिल्हानिहाय आढावा घेतला आहे. त्यातून अनेक जिल्ह्यातील पक्ष नेतृत्व बदला संदर्भातील विचार पुढे आले आहेत. नाना पटोले यांनी प्रदेश काँग्रेसची धुरा सांभाळल्यानंतर सर्वप्रथम ढेपाळलेल्या पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांनी अनेक जिल्ह्यातून पुढे येत असलेली नेतृत्व बदलाची मागणी गांभिर्याने घेतली आहे.
अनेक जिल्ह्यात तीन-तीन वर्षांच्या दोन टर्म किंवा त्यापेक्षा अधिक काळापासून अध्यक्षपदावर असणाऱ्या जिल्हाध्यक्षांना पायउतार व्हावे लागणार आहे. नवीन जिल्हाध्यक्षांची माळ कोणाच्या गळ्यात पडणार हे पाहणे ओैत्सुक्याचे ठरणार आहे. तसेच यामुळे विद्यमान जिल्हाध्यक्षाची नाराजी ओढवून पक्षात दोन गट पडण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.