बहुजननामा ऑनलाइन टीम : विधानसभा निवडणुकीच्या निकालात कोणत्याच पक्षाला एक हाती विजय मिळाला नाही , तरी महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. मात्र बहुमतानंतरही सत्तास्थापनेसाठी या दोन्ही पक्षांमध्ये संघर्ष सुरु आहे. मुख्यमंत्रिपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद सुरु आहे. अशातच राज्यात एका वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.
भाजप – शिवसेना नव्हे तर , ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल आणि काँग्रेसच्या वाट्याला उपमुख्यमंत्रिपद येईल, आणि या सरकारला शिवसेना बाहेरून पाठिंबा देईल,’ असा खळबळजनक व्यक्तव्य चक्क शिवसेनेच्या एका नेत्याने केलं आहे. शिवसेना नेत्यानेच असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. शिवसेना नेत्याने केलेला दावा जर खरा ठरला तर राष्ट्रवादी मुख्यमंत्रिपदाची धुरा नक्की कोण सांभांळणार, याबाबत उत्सुकता आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अध्यक्ष शरद पवार हेच राज्याच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत अव्वल असल्याचं म्हटले जात आहे. त्यानंतर राष्ट्रवादीकडून पक्षाचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्या नावाची चर्चा केली जात आहे.
दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत हे गेल्या काही दिवसांपासून भाजपवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. त्यांनी नुकतीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजपची साथ सोडत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या जवळकीची चर्चा होत आहे. तर दुसरीकडे अजित पवार आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद देण्याच्या चर्चेवर उत्तर देताना म्हणाले कि, मुख्यमंत्री कुणाला करावा हा शिवसेना आणि भाजपचा निर्णय आहे. अनेकदा विधिमंडळाच्या सदस्य नसलेल्यांनाही मुख्यमंत्रिपद दिलं गेलं आहे.