मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात ठाकरे सरकारने 1 मेपर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तरीही कोरोना बाधितांची संख्या कमी होताना दिसत नाही. देशाची आर्थिक राजधानी मुंबईतील परिस्थिती सर्वाधिक भयंकर आहे. येथे शुक्रवारी (दि. 16) एका दिवसात तब्बल 9 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे वाढत्या रुग्णांची संख्या लक्षात घेता मुंबईत पुन्हा एकदा लॉकडाऊन लावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्वतः महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईतील परिस्थिती पाहाता, लॉकडाऊन हा एकच पर्याय उरला असल्याचे म्हटले आहे.
महापौर पेडणेकर म्हणाल्या, की मुंबईत तब्बल 95 टक्के लोक कोरोना नियमांचे पालन करताना दिसत आहेत. मात्र, केवळ 5 टक्के लोक नियमांचे पालन करत नाहीत. त्यांच्यामुळे इतरांनाही त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस मुंबईतील रुग्णसंख्या वाढत आहे. कोरोनाची सध्याची स्थिती पाहाता मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान मुंबईत शुक्रवारी (दि. 16) 8839 लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर 53 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमध्ये आतापर्यंत तब्बल 5 लाख 61 हजार 998 लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.