बहुजननामा ऑनलाइन टीम – राज्यातील महाविद्यालये 15 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहेत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालयं सुरु होणार आहेत. तसेच, या वर्षी विद्यार्थ्यांना 75 टक्के उपस्थिती बंधनकार नसणार आहे. ही महाविद्यालयं सुरु होत असताना विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) देखील काही गाइडलाईन्स विद्यापीठांना दिलेल्या आहेत. प्रत्येक महाविद्यालयास कोरोना निमयमावलीचे पालन करणे बंधनकारक असणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
सामंत यांनी सांगितले, यूजीसीने सांगितल्या प्रमाणे वर्ग खोल्यांमध्ये बसण्याची व्यवस्था 50 टक्के रोटेश पद्धतीने विद्यार्थी संख्या घेऊन महाविद्यालयं सुरु करण्यास राज्य सरकारने आज परवानगी दिली आहे. याचा अर्थ 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यलयं सुरु होतील.
महाविद्यालय सुरु होत असताना यूजीसीने काही गाइडलाईन्स विद्यापीठांना दिल्या आहेत. यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे, संबंधित जिल्हाधिकारी संबंधित यंत्रणांना पायाभूत सुविधांची संपूर्ण माहिती दिली गेली पाहिजे. कोरोना संसर्गाच्या प्रमाणाचा आढावा घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलं पाहिजे व त्यानंतर विद्यापीठांनी आपली महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला पाहिजे.
विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन व ऑफलाईन म्हणजेच विद्यार्थ्यांच्या सोयीच्या पद्धतीने घेतल्या जाव्यात. याबाबत विद्यापीठांना निर्णय घेण्यास सांगण्यात आले आहे. प्रवेश, शिक्षण पद्धती, अभ्यासक्रम पूर्ण करणं, परीक्षा, मूल्यमापन, निकाल जाहीर करणं याबाबत जी विद्यार्थ्यांमध्ये अनिश्चितता वाटते. त्या संदर्भात देखील विद्यापीठांनी तातडीने विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मनातील शंका दूर करावी, असे यूजीसीचं म्हणण असल्याचे सामंत यांनी सांगितलं.