मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक खुशखबर असून त्यांच्यासाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठीचा प्रस्ताव सरकार करत असून तो निर्णय घेण्याबद्दल राज्य सरकार तयार असल्याचे दिसत आहे. तसेच या प्रस्तावाचा विचार असून सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोजच्या कामाची ४५ मिनिटे वाढवून पाच दिवसांचा आठवडा करता येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.
राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्याच्या निर्णयाचा विचार करत असून त्यात अत्यावश्यक सेवांसाठी पाच दिवसांचा आठवडा नसेल, असेही ठाकरे यांनी त्यावेळी स्पष्ट केले.
तसेच राज्यात ५ दिवसांचा आठवडा करण्यासाठीचा प्रस्ताव लवकरात लवकर आपल्याकडे पाठवावा, अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या. तसेच राज्यातील रिक्त पदांच्या भरतीबाबतही ठाकरे यांनी भाष्य केले असून रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.