मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – प्रशासकीय अधिकाऱ्यांना समजून घेणारे, त्यांना सन्मान आदर देणारे व्यक्तिमत्व म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिले जाते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मागच्या दोन दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना जी कृती घडली ती सध्या महाराष्ट्रभर व्हायरल होत आहे. इस्लामपूरातील वाळवा तहसील कार्यालयाच्या उदघाटन प्रसंगी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री जयंत पाटील अन्य मंत्री यावेळी उपस्थित होते.
इमारतीचे उदघाटन झाल्यावर त्या ठिकाणी जाहीर सभा होणार होती. उदघाटन पार पडल्याने साहजिकच इमारतीची पाहणीसुद्धा मुख्यमंत्री, पालकमंत्री सह अन्य मंत्री करणार होते. या दरम्यान पाहणी करीत ही मंडळी तहसील कार्यालयात पोहोचली. त्याठीकाणी तहसीलदारांची खुर्ची होती. त्यात थोडसं बसून अचानक मुख्यमंत्री ठाकरे उठले आणि थोड्या दूरवर उभ्या असलेल्या तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्या हाताला पकडून खुर्चीपाशी आणले आणि काही कळायच्या आत त्यांना सांगितले “ तुम्ही तहसीलदार ना ? मग ही खुर्ची तुमची आहे…बसा इथे “ खुद्द मुख्यमंत्री प्रेमळ शब्दांत आदेश देत आहेत, तिथे जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, मंत्री, राज्यमंत्री उपस्थित होते त्यामुळे साहजिकच गोंधळलेल्या सबनीस यांनी मुख्यमंत्र्यांना नम्रपणे मी बसू शकत नाही असे सांगितले.
पण मुख्यमंत्र्यांनी ठरवलेच होते. “ ही तुमची इमारत आहे, याठिकाणी तुम्ही प्रमुख म्हणून काम पाहणार आहात,ही तुमची खुर्ची आहे. या खुर्चीवर माझ्या हस्ते तुम्हाला स्थानापन्न करायचे आहे” असे मुख्यमंत्र्यांनी आग्रहाने हे सांगितल्यावर मग सबनीस यांचा नाईलाज झाला आणि ते त्या खुर्चीवर बसले. “ या महत्वाच्या पदावर तुम्ही आहात. तुम्हाला मी स्वत: बसवले आहे. त्यामुळे काम पण चोखपणेच करा. “असे सांगून मुख्यमंत्र्यांनी सबनीस यांची पाठ थोपटली. यानंतर मुख्यमंत्री ठाकरे निघूनही गेले, पण जेव्हा मी नवीन दालनातल्या खुर्चीत बसतो त्यावेळी मुख्यमंत्री माझ्या बाजूला उभे असल्याचा भास आजही आपणाला होत असल्याचे तहसीलदार सबनीस यांनी सांगितले.