मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्या भेटीला राजभवनावर गेले होते. यावेळी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये 20 मिनिटे चर्चा झाली. या भेटीमध्ये सध्याच्या राजकीय पेचप्रसंगावर चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. त्याआधी मुख्यमंत्री आणि राज्यपालांमध्ये चर्चा झाली आहे.
महाराष्ट्र राज्य स्थापनेला आज 60 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण करून महाराष्ट्र दिन अत्यंत साधेपणाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री राजभवनावर राज्यपालांच्या भेटीसाठी गेले. ठाकरे हे राज्य विधिमंडळातील कोणत्याही सभासदाचे सदस्य नसल्यामुळे त्यांना 27 मे 2020 पूर्वी परिषदेची निवड होणे आवश्यक आहे. कोरोना संकटानंतर या 9 जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रिया रोखली होती. दरम्यान, राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा व्हिडीओ व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार आहेत. काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विधानपरिषदेच्या रिक्त असलेल्या 9 जागांसाठी लवकरात लवकर निवडणुका जाहीर करण्याची विनंती भारतीय निवडणूक आयोगाला केली आहे.
राज्यातील सद्यस्थितीतील अनिश्चितता संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने राज्यपालांनी निवडणूक आयोगाला 24 एप्रिलपासून रिक्त असलेल्या विधानपरिषदेतील 9 जागा भरण्याची विनंती केली आहे. राज्यपालांनंतर महाविकासघाडीतील तीन महत्वाचे घटक असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने देखील एक सहा पानांचे पत्र निवडणूक आयोगाला पाठवले आहे. कोरोनाने निर्माण केलेली परिस्थिती मान्य आहे, पण काही काळजी घेवून निवडणूक घेणे शक्य करावे अशी विनंती या पत्रात करण्यात आली आहे.
एनपीन्यूज24 नेटवर्क