मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – फडणवीस सरकारने आणलेल्या अनेक योजना ठाकरे सरकारने रद्द केल्या आहेत. आणि आता फडणवीस यांनी आणलेली जलयुक्त शिवार ही योजना रद्द करणार असल्याचे बोलले जात आहे. महाविकास आघाडीच्या सरकारने योजनेला मिळणारा निधी थांबवण्याचे आदेश दिले असून विभागीय आयुक्तांनी पत्र प्रसिद्ध केलं आहे. तसेच नाशिकमधील विभागातील पाच जिल्ह्यामधील जलयुक्त शिवाराची कामे थांबवली जाणार आहेत.
ही फडणवीसांची अतिशय महत्वाची योजना होती. या योजनेतून बऱ्याच जिल्ह्यांना फायदा झाला असल्याचा दावाही फडणवीसांनी केला असून नवीन सरकारने मात्र ही योजना रद्द करण्याची तयारी केली आहे. तेव्हा नाशिक, जळगाव, नंदुरबार, नगर, धुळे या जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवाराची कामे थांबणार आहेत. विभागीय आयुक्तांचे आदेश डावलून जलयुक्त शिवार योजनेसाठी निधी दिला तर आर्थिक गैरव्यवहार म्हणून कारवाई केली जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्तांकडून देण्यात आली आहे.
ठाकरे सरकारच्या या निर्णयावर भाजपने नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला शत्रू मानणारे सरकार सत्तेत आहे. पण ते आता जनतेसोबतही शत्रूप्रमाणे वागू लागले असून मागील सरकारच्या चांगल्या योजना थांबवल्या आहेत. प्रत्येक पावलावर सरकार हेच करत आहे. सरकारची ही भूमिका दुर्दैवी आहे, असे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी म्हटले.