मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी (दि. 2) उच्चस्तरीय बैठक बोलावली असून यात राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच यावेळी राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते. परंतु अद्यापही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी दिसत आहे. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे. त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता कमी आहे.
परंतु यातून मध्यममार्ग काय काढता येईल यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या तर ठाकरे सरकारमधील नेत्यांच्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी बैठका सुरु आहेत. मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याने लोकल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. दरम्यान गुरुवारी (दि. 1) राज्यात 43 हजार 183 कोरोनाबाधित आढळले, तर 249 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच सध्याच्या घडीला राज्यात 3 लाख 66 हजार 533 सक्रीय रुग्ण आहेत.