बीड : बहुजननामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीसाठी युतीची घोषणा कधी होईल ते कळनारही नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. बीडमधील एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीवेळी भाजप शिवसेना युती झाली हे माध्यमांना कळले नाही. युती होईल की नाही याची चर्चा होत असतानाच युतीची घोषणा आम्ही केली असेही ते म्हणाले.
‘जनतेशी संवाद ठेवला नाही अन्यथा त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती’
मुख्यमंत्री म्हणाले की, “बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाच्या महाजनादेश यात्रेचं प्रचंड स्वागत केलं. तुम्ही विरोधकांच्या यात्रेची परिस्थिती पाहू शकता. लोकांचा प्रतिसाद राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या यात्रेला मिळत नाही. काँग्रेसला यात्रादेखील मंगल कार्यालयात सुरु करावी लागते. राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रा तर सुप्रिया सुळे यांनीही दुसरी संवाद यात्रा काढली. सत्तेत असताना कधीच जनतेशी संवाद ठेवला नाही. अन्यथा त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती. सत्तेत असताना त्यांनी केवळ स्वत:शी सवाद साधला. त्यांच्या पक्षाचा पर्दाफाश होतो आहे. आमच्या या यात्रेच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षात केलेली कामे आम्ही जनतेपर्यंत पोचवत आहोत.
‘उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा’
याशिवाय मराठवाड्यातील दुष्काळावर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, “कोकणातलं पाणी मराठवाड्याकडे आणायचं आहे. त्यातून उत्तर महाराष्ट्राचा काही भाग आणि मराठवाडा दुष्काळमुक्त करायचा आहे. त्यातील 25 टीएमसीचा डीपीआर तयार केल्यानंतर आम्ही तसं टेंडर लवकरच काढणार आहोत. या महाजनादेशच्या माध्यमातून लोकांचा जनादेश घेऊन त्याही पेक्षा चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत.” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.