मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – जेएनयूमधील हिंसाचारप्रकारणी मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे आंदोलनादरम्यान मेहक मिर्झा प्रभू या तरुणीने आपल्या हातात ‘फ्री काश्मीर’ असा फलक दाखवला होता. त्यामागे उद्देश काय होता याचा तपास करण्यात येत आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली.
‘काश्मीरमध्ये अजूनही मोबाईल आणि इंटरनेट सेवा सुरळीत नाही. नेत्यांना नजरकैदेत ठेवले आहे. असा परिस्थितीतून काश्मीरला मुक्त करावा या भूमिकेतून आपण ‘फ्री काश्मीर’चा फलक दाखवला असल्याचे त्या तरुणीने म्हटले आहे. त्याबाबत पोलीस चौकशी करत असून संपूर्ण माहिती आल्यानंतर गुन्ह्याबाबत निर्णय घेऊ, असेही अनिल देशमुख म्हणाले.
तसेच भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर आरोप करत हा संपूर्ण प्रकार उद्धवजी आपण सहन करणार आहात काय? असा प्रश्न केला होता.
कोरेगाव-भीमा प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाल्यानंतर अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतल्यावर मी याप्रकरणी भूमिका मांडेल. कोरेगाव-भीमा संदर्भात काही माध्यमांनी माझ्या नावाने चुकीची माहिती पसरवली आहे. त्यावर अभ्यास करून आणि अधिकाऱ्यांकडून माहिती घेतल्यांनंतर बोलेन, असेही देशमुख म्हणाले.