बहुजननामा ऑनलाईन – मराठवाड्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करावा, हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मदत करावी, विज बिल माफ करावे, शेतकऱ्यांना शंभर टक्के पीकविमा देण्यात यावा, माकणी धरणाचं पाणी कायमस्वरूपी औसा शहराला मिळावं, यांसह इतर मागण्यांसाठी औसा येथील तहसीलदार कार्यालयासमोर छावा संघटनेन उपोषण सुरु केल आहे. संघटनेचे विजय घाडगे पाटील यांनी मागण्या पुर्ण होईपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार केला आहे. मागील आठ दिवसांपासून उपोषण सुरु असल्याने पाटील यांची प्रकृती खालावली आहे.
पाटील यांची प्रकृती खालावल्यामुळे लातुरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रात्री उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. यावेळी नेहमीप्रमाणे त्यांनी आश्वासनही दिले आहे. भेटीदरम्यान निलंगेकर म्हणाले की,” उपोषण सोडलं नाही तर मी सोबत घेऊन जाईन आणि मी देखील छावाच आहे.” पालकमंत्र्यांच्या विनंतीनंतरही उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्त्यांनी केल्यामुळे भविष्यात हे उपोषण प्रशासन आणि पालकमंत्र्यांना त्रासदायक ठरू शकण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तहसील प्रशासनानं देखील उपोषणकर्त्यांना भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली. मात्र उपोषणकर्त्यानी प्रशासनाला प्रतिसाद दिला नाही.
संघटनेमार्फत सुरु असलेल्या उपोषणासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औसा बंदची हाक दिली होती. याला प्रतिसाद देत सर्व पक्ष संघटना आणि व्यापाऱ्यांनी गुरुवारी (ता.२२) कडकडीत बंद पाळला. याशिवाय त्यांच्या मागण्यांना आणि या आंदोलनाला सर्वच पक्षांनी पाठींबा दर्शविला आहे.