रायपुर : वृत्तसंस्था – छत्तीसगडच्या रायपुरच्या पंचायत निवडणुकीमध्ये एक आगळावेगळा प्रकार समोर आला आहे. येथील एका उमेदवाराने निवडणूक जिंकण्यासाठी मतदारांना भरपूर भेटवस्तू वाटल्या. पंचायत निवडणुकीत विजय निश्चित करण्यासाठी मनोहर देवांगनने घरोघरी न मागता साडी, मिक्सर ग्रायंडर, कुकर कपड्यांसह अनेक भेटवस्तू वाटल्या. मात्र, जेव्हा निकाल लागला आणि त्याचा पराभव झाला तेव्हा संतापलेल्या या उमेदवाराने लोकांना नको त्या भाषेत सुनावले आणि आपण वाटलेले सामान परत मागितले. गाववाल्यांनीही मनोहरला अद्दल घडवण्यासाठी सर्व सामान गावच्या बस स्टँडवर नेऊन ठेवले.
हे प्रकरण आरंग जनपद पंचायतच्या ग्राम पंचायत भानसोजचे आहे. गावातील वार्ड क्रमांक 7 मधून मनोहर देवांगन उमेदवार होता. निवडणूक जिंकण्यासाठी उमेदवार मनोहर देवांगनने वार्डातील लोकांना घरोघरी जाऊन न मागता मोठ्या संख्येने साडी, मिक्सर ग्रायंडर, कुकर कपड्यांसह खुप सामान वाटले. परंतु, जेव्हा निकाल लागला तेव्हा त्याचा पराभव झाला. त्याला वार्डातील एकुण 114 मधून अवघी 8 मते मिळाली होती. यामुळे संतापलेला मनोहर लोकांच्या घरोघरी जाऊन त्याने दिलेले सामान मागू लागला.
त्याने लोकांना शिवीगाळही केली. गावातील लोकांना त्याचे हे वागणे खटकल्याने त्यांनी मनोहरने दिलेले सामान आपआपल्या घरातून आणून गावातील बस स्टँडवर ठेवले. आरंग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सोबतच राज्य निवडणूक आयोगाचे पथक सुद्धा गावात दाखल झाले असून तपास करत आहे.