बहुजननामा ऑनलाइन – सध्या मराठा आरक्षणावरून राजकीय वातावरण तापलेले आहे. त्यातच संभाजीराजेंच्या विधानावर आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी एक वक्तव्य केले आहे. राजे सर्व जनतेचे असतात, रयतेचे असतात, एका समाजाचे नाही. सर्व समाजाचा विचार राजांनी करावा. आता संभाजीराजे तलवारीचा वापर ओबीसींवर करतात की अजून कोणावर करतात ते बघावे लागेल, असे म्हणत अन्न पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार संभाजीराजे छत्रपतींवर निशाणा साधला आहे. मात्र, आता शाब्दिक वाद थांबवावे, असा सल्लाही भुजबळांनी दिला आहे.
छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, राजे आणि नेत्यांनी मनाला लागेल, आशा गोष्टी टाळता आल्या तर त्या टाळल्या पाहिजे. शिवाजी महाराजांनी देखील अठरा पगड जातीला सोबत घेऊन लढाई लढली. महाराज हे सगळ्यांचे आहेत.
भुजबळ पुढे म्हणाले, एमपीएससी परीक्षा रद्द करू नये, हे माझं वैयक्तिक मत आहे. कोरोनाची स्थिती पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतला. आपल्याला राज्यात आता हळू हळू सर्व खुलं करायचं आहे. परिस्थिती बघून कमिटी निर्णय घेईल.
कांदा निर्यातीबाबत भुजबळ म्हणाले, केंद्र सरकारनं दक्षिण भारतातील कांद्याला निर्यात परवानगी दिली आणि महाराष्ट्राला दिली नाही, हा दुजाभाव का? मात्र, यामुळे भाव स्थिर राहायला मदत होईल.
संभाजीराजेंनी हे वक्तव केलं होतं
मराठा आरक्षणासह समाजाच्या विविध मागण्यांसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या तिसर्या पर्वाला तुळजापूर येथून सुरूवात झाली. खासदार छत्रपती संभाजीराजे, खासदार ओमराजे निंबाळकर मोर्चात सहभागी झाले. याप्रसंगी संभाजीराजेंनी म्हटले होते की, मराठा आरक्षण टिकवण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी पडत आहेत. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये समन्वय नाही. आम्ही भिकारी नाही तर हक्क मागत आहोत, आम्हाला कायदा हातात घेण्याची वेळ आणू नका, वेळ आल्यास तलवार पण काढेन, असे वक्तव्य खासदार संभाजीराजे यांनी केले होते.