रायबरेली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये एका मुलीचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. रस्त्याच्याकडेला एका ढाब्याजवळ सापडलेल्या या मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. परंतु, मृतदेहाची आवस्था पाहून अंगावर शहारे येत असल्याचे स्थानिकांनी सांगितले. ही घटना रायबरेलीच्या हरचंदपुरमध्ये एका ढाब्याच्या पाठीमागे घडली.
रायबरेली-लखनऊ हायवेच्या कडेला झाडखाली शनिवारी एका तरूणीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. हा मृतदेह सापडल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरूणीचे वय सुमारे 25 असल्याचा अंदाज आहे. तिची ओळख पटवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. बलात्कार केल्यानंतर तरूणीची हत्या करून मृतदेह जाळला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
कशी मिळाली घटनेची माहिती
सर्वात प्रथम शाळेतून घरी परतणार्या मुलांनी अर्धवट जळालेला तरूणीचा मृतदेह पाहिला. घटनास्थळापासून दुपारी 2 वाजता शाळकरी मुले जात असताना त्यांनी हा मृतदेह पाहिला. तरूणीचा हा अर्धवट जळालेला मृतदेह पाहिल्याचे मुलांनी आजूबाजूच्या लोकांना सांगितले. यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
पोलीस ठाण्याचे प्रमुख अनिल कुमार सिंह पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. सुमारे 25 वर्षांच्या या अज्ञात तरूणीचा मृतदेह उपड्या आवस्थेत बागेत पडला होता. बागेत दूरपर्यंत पडलेली झाडांची सुकलेली पाने सुद्धा जळालेली दिसत होती.
बलात्काराची शंका
तरूणीचे हात-पाय बांधलेले होते आणि गळा आवळलेला होता. पायातील चप्पल अर्धवट जळालेल्या होत्या. जवळच अर्धवट जळालेली एक जेन्ट्स पर्स, केमिस्ट्रीचे पुस्तक सापडले. मृतदेह रॉकेल ओतून जाळण्यात आला आहे. या युवतीवर बलात्कार झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
फॉरेन्सिक टीम प्रमुख डॉ. प्रतिभा त्रिपाठी, अजीत तिवारी यांनी मृतदेह आणि घटनास्थळाचे बारकाईने निरिक्षण केले. या अधिकार्यांनी सांगितले की, तरूणीला मारण्यात आल्यानंतर मृतदेह येथे आणून जाळण्यात आला आहे.