नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या चांद्रयान-२ प्रकल्पाच्या संचालिका एम. वनिता यांना चांद्रयान-३ मोहिमेतून वगळण्यात आले आहे. रितू कारिधाल यांना चांद्रयान -३ मोहिमेच्या संचालकपदी कायम ठेवण्यात आले आहे. व वनिता यांच्या जागी पी. वीरामुथुवेल हे प्रकल्प संचालक असणार आहेत.
वनिता यांच्या टीमकडे चांद्रयान-२ मिशनमधील सर्व सिस्टिम्सची जबाबदारी होती. याच सिस्टिमचा भाग असलेल्या विक्रम लँडरचे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग अपयशी ठरले होते. वनिता यांच्या बदलीमागे नेमके काय कारण आहे ते इस्रोने अधिकृतरित्या जाहीर केलेले नाही. इस्रोच्या २८ नोव्हेंबरच्या पत्रकामध्ये एम.वनिता यांच्या बदलीची माहिती देण्यात आली आहे.
“एम.वनिता या उत्तम शास्त्रज्ञ असून त्या सध्या चांद्रयान-२ मोहिमेच्या प्रकल्प संचालिका आहेत. त्यांची आता पीडीएमएसएच्या उपसंचालकपदी नियुक्ती करण्यात येत आहे. इस्रोच्या मुख्यालयात कार्यरत असणारे पी. वीरामुथुवेल यांची चांद्रयान-३ च्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे.” पी. वीरामुथुवेल हे प्रकल्प व्यवस्थापन टीमचेही प्रमुख असणार आहेत. इस्रोने सात डिसेंबर रोजी काढलेल्या दुसऱ्या आदेशात ही माहिती दिली आहे. मिशनचे वेगवेगळे टप्पे लक्षात घेता इस्रोने प्रकल्प संचालकांबरोबर २९ उप प्रकल्प संचालकांची निवड केली आहे. त्यांच्याकडे लँडर आणि रोव्हरची महत्वाची जबाबदारी असेल.
Visit : bahujannama.com