मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्याही वेगाने वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणांवर याचा मोठा ताण येत आहे. परिणामी, आवश्यक त्या आरोग्य सेवा-सुविधाही पुरवता येत नाहीत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. ‘सर्व काही केंद्रावर ढकलणार, मग तुम्ही काय करणार?’, असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून उपस्थित केला.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी काल (शुक्रवार) राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी एक प्रेस नोट काढून निशाणा साधला. त्यामध्ये त्यांनी म्हटले, की ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऑक्सिजन, रेमडेसिव्हिर, कोरोना लस अशा प्रत्येक बाबतीत केंद्रावर जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व काही केंद्र सरकारनेच करायचे असेल तर राज्य सरकार स्वतःहून काय करणार? असा सवाल उपस्थित केला.
तसेच त्यांनी पुढे म्हटले, की ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती नोव्हेंबर महिन्यातच मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली होती. तर गेल्या पाच महिन्यातच असे ऑक्सिजन प्रकल्प उभे केले असते तर आज त्यासाठी धावाधाव करावी लागली नसती. त्यांनी केंद्राने ऑक्सिजनचा 500 मेट्रिक टनांचा अधिक पुरवठा मंजूर केल्यामुळे राज्याची गरज जेमतेम भागते हे कबूल केले ते बरे झाले, असेही चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.