मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई हागणदारीमुक्त झाल्याचे चार वर्षापूर्वी घोषीत करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात असे झाले नसल्याचे दिसून येत आहे. हागणदारीचा फटका मध्य रेल्वेला बसत आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावरील मानवी विष्ठेमुळे रेल्वे रुळाचे आयुष्यमान कमी होत असून देखभाल खर्च वाढत आहे. याचा परिणाम मुंबईची लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या लोकल्सवर देखील होत आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर लोकल्सचा वेग कमी करावा लागत आहे.
मध्य रेल्वेच्या काही मार्गावर रेल्वेचा ताशी वेग 100 किमी आहे. मात्र काही मार्गावर रेल्वेचा वेग ताशी 30 किमी आहे. काही पट्ट्यामध्ये रेल्वेचा स्पीड 30 किमी पेक्षा जास्त ठेवता येत नाही. तर काही ठिकाणी रेल्वे रुळ गंजले असल्याने ते धोकादायक बनले आहेत. हे रुळ गंजण्याचे मूळ कारण आहे मलमूत्र. असे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, मानवी विष्ठेमुळे रेल्वे कामगारांना रुळावर काम करणे अडचणीचे झाले आहे. तसेच यामुळे रेल्वे रुळाचे आयुष्यमान 50 टक्क्यांनी कमी होत आहे.
नागरिकांनी रेल्वे रुळावर प्रत:विधी करु नयेत, यासाठी रेल्वे प्रशासनाकडून वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत. रेल्वे रुळाच्या बाजूला झोपडपट्टी असल्याने त्या ठिकाणी आरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. रेल्वे रुळावर प्रात:विधी करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे, नोटीस देण्यात येत आहे. मात्र, ही समस्या सुटलेली नाही, असे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जोपर्यंत झोपडपट्टीतील राहणीमान सुधारत नाही तोपर्यंत ही समस्या राहणार आहे. झोपडपट्टीतील राहणीमान सुधारावे यासाठी रेल्वेचे अधिकारी महापालिकेच्या सतत संपर्कात असतात.