बहुजननामा ऑनलाइन टीम – शेतकरी लाखाचा पोशिंदा आहे. त्याच्याबाबत केंद्र सरकारचे वर्तन दुर्दैवी आहे. शेतकरी प्रश्नांबाबत केंद्र सरकारला कुठलीही चिंता राहिलेली नाही. आठ-दहा वेळा झालेल्या सर्व चर्चा निष्फळ ठरल्या (Deputy Chief Minister Ajit Pawar)आहेत. हा एकप्रकारे शेतकऱ्यांचा अपमान आहे. त्यामुळे केंद्राचा निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र सरकारवर टिका केली. बारामती येथील अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या वतीने सोमवार (दि. १८) पासून कृषि तंत्रज्ञान सप्ताह आयोजित केला आहे. या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पवार माध्यमांशी बोलत होते.
पुढे बोलताना पवार म्हणाले, दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आम्ही देखील सहभागी होणार आहोत. तसे पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. या आंदोलनाला महाविकास अघाडीमधील तिनही पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे. आंदोलनात सहभाग नोंदवत असताना मुंबईमध्ये गर्दी करण्यापेक्षा प्रत्येकाने आपआपल्या तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी आंदोलन कारवीत. तर ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमधील पक्षांना यश मिळाले आहे. कार्यक्रमा दरम्यान आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री राम शिंदे यांच्या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पॅनेलचा विजय झाल्याचे सांगितले, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
मुंडेंबाबत सत्यता पडताळूनच पुढील निर्णय घेण्यात येणार…
सामाजिक न्यायमंत्री धनंयज मुंडे यांच्यावर अत्याचाराच्या झालेल्या आरोपांची चौकशी सुरू आहे. ज्या महिलेने हे आरोप केले त्या महिलेवर भाजप, मनसेच्या नेत्यांबरोबरच विमानसेवा कंपनीतीन अधिकाऱ्याने देखील आरोप केले आहेत. त्यामुळे या प्रकरणातील सत्यता पडताळूनच पुढील निर्णय घेण्यात येतील. हे पक्षाचे नेते शरद पवार यांनी सांगितले आहे, त्यामुळे या प्रकरणात पवार साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असेल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपाबाबत स्पष्ट केले. तर नामांतराच्या मुद्द्यावर आमच्यात मतमतांतरे आहेत. त्यामुळे या मुद्द्यावर एकत्र बसून मार्ग काढण्यात येईल. महाविकास आघाडी सरकारमध्ये जो कमान समान कार्यक्रम ठरला आहे. त्यानुसारच निर्णय घेण्यात येईल, असेही यावेळी पवार यांनी सांगितले.