नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना महामारीने भारतात सध्या कहर माजवला आहे. याकाळात देशात लोक उपाशी मरत आहेत. कोविड रुग्ण रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर तसेच ऑक्सिजन मिळालं नाही म्हणून मृत्युमुखी पडले आहेत. अशा भीषण परिस्थितीत केंद्र सरकारने आपला खर्च कमी करण्यासाठी काही चांगली पावले उचलली आहेत.
सर्व मंत्रालय विभाग गौण कार्यालये आणि स्वायत्त संस्थांना वित्त मंत्रालयाने याबद्दलचे आदेश जारी केले आहेत. आयात केलेल्या कागदावर मुद्रण होणार नाही, पुस्तकांचे मुद्रण केले जाणार नाही. तसेच विविध स्थापना दिन, जयंत्यासारख्या उत्सवांवर खर्च केला जाऊ नये. आवश्यक असल्यास, कमी खर्च केला पाहिजे. अशा कार्यक्रमांसाठी प्रवास करता कामा नये आणि अशा कार्यक्रमांत दिल्या जाणाऱ्या पिशव्या व मोमेन्टो बंद केले पाहिजेत, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत.
केंद्राकडून असे म्हटले आहे की सर्व मंत्रालये आणि विभागांनी येथे नियुक्त केलेल्या सल्लागारांचा आढावा घ्यावा. सल्लागारांची संख्या कमी करावी. त्यांना दिले जाणारे शुल्क किमान ठेवले पाहिज तसेच इथून पुढे नवीन पदाचा खर्च अर्थ मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय केला जाऊ शकणार नाही. मंत्रालये व इतर विभागात नवीन पदे तयार करण्यासही बंदी असेल.